शीतलटाईम्स - भारतीय समर्थकांतील नैराश्य विश्वचषक स्पर्धेचं महत्व कमी करणार ? शीतल टाईम्स । डॉ.दत्ता विघावे
भारतीय समर्थकांतील नैराश्य विश्वचषक स्पर्धेचं महत्व कमी करणार ?
शीतल टाईम्स । डॉ.दत्ता विघावे
सातव्या विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्याच एक मोठा उलटफेर झाला. या स्पर्धेच्या संभावित विजेत्यांमध्ये आघाडीवर असलेल्या भारताला कुणाच्याही खिजगणतीत नसलेल्या भारताचा कट्टर वैरी पाकिस्तानकडून एक अनपेक्षित असा नामुष्कीजन्य पराभव स्विकारावा लागला. टि ट्वेंटी विश्वचषकाच्या इतिहासात या सामन्यापूर्वी भारत व पाकिस्तान यांच्यात पाच सामने झाले होते ते सर्व भारताने जिंकले होते. शिवाय यंदा भारताच्या संघात एका पेक्षा एक सरस खेळाडू असल्याने भारतीय क्रिकेट रसिकांना भारत शंभर टक्के जिंकणारच हा अंधविश्वास होता. परंतु प्रत्यक्ष सामन्यात खेळाच्या सर्वच क्षेत्रात पाकिस्तानने भारताला निष्प्रभ केले व कोणतेही अतिरिक्त नुकसान होऊ न देता आरामात लक्ष्य साध्य करून भारतीय संघाला धाडकन जमिनीवर आदळवले. त्यामुळे भारतीय समर्थकांत मोठी निराशा पसरली.
भारताच्या या पराभवाने भारतीय क्रिकेट रसिकांसाठी नुकताच सुरू झालेला विश्वचषक संपल्यासारखं वातावरण तयार झालं आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांची भारतीय संघाकडून खूप मोठी अपेक्षा होती. परंतु भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानशी दोन हात करण्यापेक्षा साक्षात शरणागती पत्करल्याने भारतीय समर्थकांचे नाराज होणे वाजवी आहे.
खेळ म्हंटला की हार जित आलीच. परंतु कोणताही प्रतिकार न करता सरळ सरळ गुडघे टेकणे हे कोणालाही न समजण्या पलिकडचे होते. कोणतीही मालिका असो किंवा स्पर्धा भारतीय संघ पहिल्या सामन्यात हारतो, आता ही एक परंपराच होऊन बसली आहे. हे आपण मागील कित्येक वेळा अनुभवले आहे. पहिला सामना सहज हरायचे व नंतरचे सामने लिलया जिंकायचे ही भारतीय संघाने अलिखित प्रथाच पाडली असून भारताला यातून लवकरात लवकर सावरावे लागणार आहे.
स्वतःला वर्ल्ड चॅंपियन समजायचे आणि गल्ली बोळातल्या पोरांसारखे खेळायचे हे भारतीय संघाने आता दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. भारताचा संघ कोणत्याही मालिकेत किंवा स्पर्धेत पहिल्या सामन्यात हारण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे संघ निवड ! संघाची निवड करताना संघ प्रबंधन वातावरण, खेळपट्टी, खेळाडूंचा फॉर्म, तंदुरूस्ती व विरोधी संघाच्या कमजोर व मजबूत बाबींचा विचार न करताच भारतीय संघ निवडते हे आता स्पष्ट होते. तसेच कर्णधार प्रथम आपल्या पसंतीच्या खेळाडूंना प्राधान्य देतो हे ही आता जगजाहीर झाले आहे.
पहिल्या सामन्यातील पराभवाने जनतेत प्रक्षोभ पसरल्यानंतर तातडीने संघात मोठे फेरफार केले जातात व नंतर संघाची गाडी पूर्व पदावर येते व संघ विजेतेपदही मिळवितो. हे सुध्दा भारतीय प्रेक्षकांच्या अंगवळणी पडले आहे. तेंव्हा सुरूवातच योग्य खेळाडूंना घेऊन केली तर आता आली अशी आफत येणारच नाही. हे सर्व सामान्य क्रिकेट चाहत्याला समजते तर कोटयावधी रुपये मानधन घेणारे कर्णधार, हेड कोच, सहाय्यक प्रशिक्षके व इतर धुरंधरांना का समजत नाही ?
भारत - पाक सामन्याचा विचार केला तर भारतीय संघ, संघाची निवड करतानाच सामना हारला होता. हार्दिक पांड्या गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्याही अँगल मधून फिजिकली फिट नाही, फलंदाज म्हणून फॉर्मात नाही व गोलंदाजी ही बाब त्याच्या आवाक्यात नसल्यासारखीच झाली आहे. शिवाय त्याचे पूर्वीचे रेकॉर्ड फार काही आकाशाला गवसणी घालणारे नाहीत. त्यामुळे त्याला खेळविण्याचा अट्टाहास करणारे महाभागच सर्वप्रथम या पराभवाला जबाबदार आहेत.
दुसरी बाब म्हणजे भुवनेश्वर कुमार दुखापतीतून अजून पूर्ण सावरलेला नाही व त्याची पूर्वीची संतुलित व नियंत्रित गोलंदाजी आता औषधालाही शिल्लक नाही. तरी त्यालाच खेळविण्याची चुक करणारे या पराभवाला निमंत्रीत करण्यात दोषी ठरतात.
वरूण चक्रवर्ती हा मिस्ट्री स्पिनर अतिशय गुणवान खेळाडू आहे. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा त्याचा अनुभव अत्यल्प आहे. शिवाय या महत्वाच्या सामन्यापूर्वी त्याच्या फिटनेस बाबतही मोठी चर्चा होती. तरीही त्याला खेळवून त्याचा आत्मविश्वास कमी करण्याचे कार्य त्याला खेळविणाऱ्यांनी केले. वरूणला बाबर आझम व मोहम्मद रिझवाने गल्लीतल्या पोरांसारखं सहज खेळून काढले, तिथेच भारताचे उरले सुरले अवसान गळून गेले होते.
अनुभवी रवीचंद्रन आश्विन, फॉर्मात असलेला ईशान किशन, गोल्डन आर्म असलेला खेळाडू म्हणून ख्याती प्राप्त शार्दूल ठाकूर यांना बेंचवर बसवून कोहली, धोनी, शास्त्री या त्रिकुटानेच पाकविरूद्ध पराभवाला ओढवून घेतले आहे.
वास्तविक या एका पराभवाने जग कोसळले नाही. अजून चार साखळी सामने शिल्लक असून ते सर्व जिंकून भारत उपांत्य फेरीत जाऊ शकतो. मात्र त्यासाठी संघाच्या सर्व घटकांना या पराभवाने झालेली पराभूत मानसिकता झटकावी लागणार आहे. तसेच संघ निवड करताना परिस्थितीचे भान संघ प्रबंधनाने ठेवावे. शिवाय संघात संधी मिळालेल्या खेळाडूंनी सर्वस्व झोकून खेळ केल्यास पराभव त्यांच्या आसपासही फिरकणार नाही.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
******************************************************
******************************************************
- संपूर्ण महाराष्ट्रतील ज्वलंत प्रश्नांशी निगडीत असलेले -
***** साप्ताहिक शीतल टाईम्स ******
******* R.N.I.NO.MAHMAR/2003/13182 *******
- बातम्या व जाहिरातीसाठी
************-संपर्क-*************
✒️ मुख्य संपादक - नरेंद्र लचके
********** मो. 9225327176
✒️ उपसंपादक - सुहास शेलर
********** मो. 8485867429
✒️ जिल्हा प्रतिनिधी - शकील(बाबा)शेख
********** मो. 9273729867
*******************************************************
*******************************************************
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा