शीतल टाईम्स //'आई'चा शाम !
'आई'चा शाम !
शामची आई हे साने गुरुजींनी लिहिलेलं पुस्तक बालपणी पासूनच आवडीचा विषय होते, तो शाम आणि त्याची आई त्या दोघां मधील प्रेम, संवाद, आपुलकी, जिव्हाळा कसा असेल या उत्सुकतेपोटी शामची आई पुस्तक वाचले आणि ते इतके आवडले की आजही मनाच्या एका कप्यात शाम आणि त्याची आई दोघेही जपले आहेत. आता आजकाल मनात एक प्रश्न पडतो, शाम ने लिहिलेली आई खूप कष्टाळू, करारी, शिस्त प्रिय, मुलांना संस्कार देणारी होती, प्रत्येक परिस्थितीत कुटुंबाला साथ देणारी आदर्श माता होती, सगळे खरे, मना पासून मान्य... पण, शाम सुद्धा कमालीचा संवेदनशील, आज्ञाधारक, काळजी घेणारा, काळजी करणारा होता म्हणूनच तर तो आपल्या आईला अमर करू शकला पुस्तक रूपाने...
आजची परिस्थिती पाहता आजही शमच्या आई सारख्या अनेक माता पाहायला मिळतात. ज्या घरी दारी सगळीकडे लढत असतात, त्यांचे मुलांवर बारकाईने लक्ष असते, अतिशय प्रेम, जिव्हाळा, आपुलकी त्यांच्यातही पहायला मिळते पण आजचा शाम तसा दिसत नाही... आजचा शाम खूप वेगळा आहे, त्याची संवेदनशीलता कमी झाली आहे का? तो बेजबाबदार झाला आहे का? सर्व काही मुबलक असतानाही त्याचा सर्वांगीण विकास का झालेला दिसत नाही? त्याला निसर्गाची आवड नाही, ती जी अनामिक ओढ असते घराची ती कुठे तरी कमी झाली की काय? या सगळ्या गोष्टींची जाणीव पालकांना होऊ लागली की प्रचंड ताण तणाव व काळजीने ते मानसिक, भावनिक आणि शारीरिक कोलमडू लागतात. शाम मध्ये झालेल्या बदलाला, परिवर्तनाला जबाबदार कोण? वाढती स्पर्धा, आपेक्षांचे ओझे, चंगळवादी समाज, शिक्षणा नंतर उपलब्ध उपजीविकेच्या साधनांची कमतरता या सर्व गोष्टी शामच्याही मनावर परिणाम करतात का...? किती अभ्यास केला की पालक खुश, कोणती पदवी घेतली की जीवन सुरक्षित याचा काहीच मापदंड नाही. कळायला लागल्यापासून ते महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होई पर्यंत सतत तणाव चांगल्या मर्कांचा आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रचंड तणाव नोकरीचा, काय अवस्था होत असेल त्या जीवाची, किती घालमेल, किती धडपड...
मग अशा या समाजव्यवस्थेत आपली मुले प्रामाणिक, आज्ञाधारक, समाजहित जपणारी बनण्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे हा खूप महत्वाचा विषय आहे. मुलाला चांगले मार्क पडावेत, प्रत्येक स्पर्धेत मुल अव्वल यावे यासाठी प्रत्येक पालक काहीही करायला तयार असतो, कारण त्याला आपल्या मुलाला उच्च पदवीधर, उच्च पदाधिकारी झालेले पाहायचे असते. चांगली गोष्ट आहे, पण त्या धडपडीत मुलाचे हास्य आपण कधी हिरावून घेतो हे आपल्यालाच कळत नाही.कित्येकदा पालक म्हणतात आमच्या मुलाला जरा समजून सांगा, पण मुलाशी बोलल्यावर कळते, पालकांनाच समजून सांगण्याची गरज आहे. पुढील वाक्य तर खूपच खटकनारे आहे पण आपल्या अपेक्षित ठिकाणी पोहोचण्याचा हाच रस्ता आहे. आपले मुल साधे कारकून बनले तरी चालेल पण तो चांगला माणूस बनणे खूप महत्त्वाचे आहे. हे प्रत्येक पालकाला वाटले पाहिजे. तू आहेस तसाच खूप छान आहेस, मला तुझा खूप अभिमान आहे असे प्रेरणा देणारे शब्द मुलांसाठी वापरले की चैतन्याची चकाकी त्यांच्या डोळ्यात दिसू लागते, त्यांच्या चालण्या बोलण्यात आत्मविश्वास येतो आणि ते धडाडीने, उमेदीने आपली संपूर्ण क्षमता वापरू लागतात. चांगला माणूस बनण्याची पाया भरणी झाली की आपोआप तो चांगला विद्यार्थी, चांगला पदवीधर आणि चांगला पदाधिकारी होणारच आहे. आता ही पायाभरणी कशी करायची हा पण एक विषय आहे ते ही आपण पाहूच. मोठी पदवी, मोठा अधिकारी बनण्याची क्षमता प्रत्येकात असेलच हे नाही सांगू शकत पण चांगला माणूस बनण्याची क्षमता मात्र प्रत्येकात असतेच. असा चांगला माणूस घडवण्याचा प्रयत्न प्रत्येक पालकाने केला की घरोघरी शाम जन्माला येतील यात शंका नाही.
वर्षा सुरासे, पुणे
आर्ट ऑफ लिव्हिंग शिक्षिका
मो. 8855899102
(विचार लेखिकेचे वैयक्तिक आहेत)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा