शीतल टाईम्स //- उलट्या दिशेने चालत बापूराव गुंड देतायत माणुसकीचा संदेश
शीतल टाइम्स प्रतिनिधी
उलट्या दिशेने चालत बापूराव गुंड देतायत माणुसकीचा संदेश
बेलापूर (प्रतिनिधी) – "समाज सरळ वाटेने चालावा म्हणून मी उलट्या दिशेने चालतोय!" असा अनोखा संदेश देणारे फुरसुंगी (पुणे) येथील बापूराव गुंड सध्या पंढरपूर ते शिर्डी असा प्रवास उलट्या दिशेने करत आहेत. माणुसकी, आपुलकी, सहकार्य आणि शांततेचा संदेश देण्यासाठी त्यांनी हा वेगळाच मार्ग निवडला आहे.
बेलापूर येथे कृषी विद्यापीठाजवळील रस्त्यावरुन उलट्या दिशेने चालत असलेले हे भगवे वस्त्रधारी महंत पत्रकार देविदास देसाई यांच्या लक्षात आले. थांबून संवाद साधल्यावर बापूराव गुंड यांनी आपल्या प्रवासामागील हेतू स्पष्ट केला.
“आजच्या समाजात माणुसकी हरवत चालली आहे. तिरस्कार, हेवा, द्वेष यामुळे माणूस दुःखी झाला आहे. म्हणूनच मी उलट्या दिशेने चालून लोकांना सरळ मार्गाचा संदेश देतोय,” असे त्यांनी सांगितले. तसेच प्रवासात त्यांना जाणवणाऱ्या रस्त्यांच्या समस्यांबाबत त्यांनी राज्य व केंद्र शासनाला सूचना पाठवल्याचेही त्यांनी नमूद केले. “शासनाने योग्य निर्णय घेतल्यास रस्ते अपघात कमी होऊ शकतात,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
फक्त माणुसकीचा नव्हे तर मतदानाचा संदेशही ते देत आहेत. “मतदान हा आपला हक्क आहे. कुणाच्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे, विवेकाने मतदान करा,” असे आवाहनही त्यांनी केले.
एम.ए. शिक्षण घेतलेल्या बापूराव गुंड यांनी भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, मतदान जनजागृती अशा अनेक विषयांवर कार्य करत शासनाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या या अनोख्या सामाजिक चळवळीने रस्त्यावर चालणाऱ्यांचे लक्ष वेधले असून अनेक ठिकाणी त्यांचे कौतुकही होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा