शीतल टाईम्स //- दिव्यांग मदतीचा कर्मचाऱ्याला ५० हजारांचा "भूर्दंड"; इज्जतीचा पंचनामा!
शीतल टाइम्स प्रतिनिधी
दिव्यांग मदतीचा कर्मचाऱ्याला ५० हजारांचा "भूर्दंड"; . इज्जतीचा पंचनामा!
बेलापूर (प्रतिनिधी) – एका दिव्यांग व्यक्तीस मदतीच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी एका कर्मचाऱ्याने स्विकारली, पण ही जबाबदारी त्याला चांगलीच महागात पडली. अखेर ५० हजार रुपये रोख रक्कम भरावी लागली आणि सामाजिक इज्जतीचाही पंचनामा झाला. रात्री उशिरा हा सगळा प्रकार मिटवण्यात आला, तेव्हा कुठे त्या कर्मचाऱ्याने सुटकेचा निश्वास टाकला.
घडलेली घटना अशी – परिसरातील एका कुटुंबात दिव्यांग मुलगा असल्याची माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी एका कर्मचाऱ्याला त्या मुलाच्या घरी जाऊन सर्व शासकीय योजनांची माहिती देण्याचे आदेश दिले. आदेशाप्रमाणे तो कर्मचारी त्या घरात गेला आणि त्या दिव्यांग मुलाच्या आईला लाभाच्या योजनांची माहिती दिली. तसेच दिव्यांग प्रमाणपत्र काढण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करत, अडचण आल्यास संपर्क साधण्यास स्वतःचा फोन नंबर दिला.
यानंतर त्या महिलेने दिवसभर वेगवेगळ्या कारणांवरून त्याला फोन केले. संबंधित कर्मचारी प्रामाणिकपणे सर्व चौकशीला उत्तर देत होता. परंतु संध्याकाळी अनपेक्षित प्रकार घडला. ती महिला थेट राहुरी येथील कर्मचाऱ्याच्या घरी पोहोचली आणि आरडाओरड करत त्याने दिवसभर आपल्याला घेऊन फिरवले, त्रास दिला अशा स्वरूपाचे आरोप करत गोंधळ घालू लागली.
ही घटना पाहून कर्मचारीही गोंधळून गेला. परिसरातील नागरिक गोळा झाले आणि प्रकार चिघळला. अखेर त्या कर्मचाऱ्याने आपल्या मित्रांच्या सल्ल्याने ती महिला घेऊन बेलापूर गाठले. तेथून सरळ पोलीस स्टेशन गाठले. न्याय मिळेल, या आशेने पोलीसांकडे गेला; पण तिथेही ती महिला ताठर भूमिका घेऊन ठामपणे आरोप करत राहिली.
रात्री ११ वाजता सुरू झालेला हा प्रकार थेट दीड वाजेपर्यंत चालला. अखेर त्या महिलेने "समोरा-समोरा" प्रस्ताव ठेवला. गावातील काही व्यक्तींच्या मध्यस्थीनंतर, मनाविरुद्ध का होईना, त्या कर्मचाऱ्याने ५० हजार रुपये रोख रक्कम दिली आणि प्रकरण मिटवण्यात आले.
सदर कर्मचारी दिवसभर पंचायत समितीत आपल्या सहकाऱ्यांसोबत काम करत होता. केवळ वरिष्ठांच्या आदेशावरून मदतीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याची ही अवस्था झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या "हनी ट्रॅप" घटना ग्रामीण भागात घडल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही कर्मचारी लवकरच गटविकास अधिकाऱ्यांना भेटून या संदर्भात लेखी निवेदन देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा