शीतल टाइम्स //-बेलापूर खुर्द: हजारोंच्या वर्दळीच्या ‘नाव घाटा’वर एकही मुतारी नाही! ग्रामपंचायतीकडून कायम दुर्लक्ष; महिला व विद्यार्थिनींची कुचंबना
शीतल टाइम्स प्रतिनिधी
बेलापूर खुर्द: हजारोंच्या वर्दळीच्या ‘नाव घाटा’वर एकही मुतारी नाही!
ग्रामपंचायतीकडून कायम दुर्लक्ष; महिला व विद्यार्थिनींची कुचंबना
बेलापूर खुर्द (वार्ताहर)
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द हे गाव विविध कारणांनी प्रसिद्ध असले तरी विकासाच्या मूलभूत गरजांकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. विशेष म्हणजे गावातील सर्वात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ‘नाव घाटा’वर आजही एकही सार्वजनिक मुतारी उपलब्ध नाही.गावाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नाव घाट परिसरात केशकर्तनालय, किराणा, फळांची दुकाने, हॉटेल्स, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, तसेच हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय यामुळे दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. प्रवरा नदीकाठी दशक्रिया विधीसाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे तसेच महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर कपडे धुण्यासाठी येथे येत असतो. तरीदेखील मूलभूत गरजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
शाळेतील सुमारे हजार - बाराशे मुलामुलींचा रोजच्या शिक्षणासाठी या परिसरात वावर असतो. महिला व विद्यार्थिनींच्या सोयीसाठी एकही मुतारी नसल्याने त्यांची प्रचंड कुचंबना होत आहे. युवकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या, मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी आरोग्य केंद्राजवळ शौचालयाचे बांधकाम केले असले तरी ते सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या जवळ असल्याने आजतगायत बंदच आहे.
स्थानिक नागरिक म्हणतात, “ज्या ग्रामपंचायतीकडून नाव घाटासारख्या वर्दळीच्या ठिकाणी एक मुतारी उभारली जात नाही, त्या ग्रामपंचायतीकडून गावातील रस्ते, पाणी, वीज यांचा विकास कितपत होणार हे सुज्ञ नागरिकांनी ओळखावे.”
याबाबत गावकऱ्यांचा संताप व्यक्त होत असून लवकरच ग्रामपंचायतीने या गंभीर प्रश्नाचा विचार करून स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र सार्वजनिक मुतारी उभारावी, अशी मागणी होत आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा